महाराष्ट्र

शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, उद्धव ठाकरेंनी धोका दिला- शहांचा आरोप

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 Sept :- शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंनी धोका दिला. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. शहा यांनी मुंबईत भाजपचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना मेघदूत बंगल्यावर मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.

शहा म्हणाले, “जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. महाराष्ट्रातले हिंदूविरोधी राजकारण संपवायचे आहे. उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कशाप्रकारे धोका दिला, हे तुम्हाला माहिती आहे. राजकारणात सगळं काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून अमित शहांनी जवळपास 200 पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. ते म्हणाले, 2014 मध्ये शिवसेनेने फक्त दोन जागांसाठी युती तोडली. भाजपने कधीच छोटा भाऊ, मोठा भाऊ असे केले नाही. पण भाजपाच्याच जागा पाडून शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही त्यांनी केला.

मुंबई महापालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचा शहांनी निर्धार केला. मुंबईच्या राजकारणात भाजपचाच दबदबा राहिला पाहिजे. शिवसेनेला आम्ही लहान केले नाही, तर शिवसेना स्वतःच्या निर्णयांमुळे छोटी झाली. खयाली पुलाव शिजवल्यामुळे शिवसेना फुटून त्यांची वाईट अवस्था झाली, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून आणि लढा आवेशपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू.

आपल्या जीवनातील ही शेवटली निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले. आपले ‘मिशन मुंबई’ साठी सर्व पदाधिकरी नगरसेवक भाजपा कार्यकर्त्याचे महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीसांनी म्हटले.