महाराष्ट्र

मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 July :- “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावरुन भाजप नेते दररोज टीका करत आहेत. आता गोपीचंद पडळकर यांनीही निशाणा साधला. गोपीचंद पडळकर म्हणाले, “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे.

जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय”,केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच आहे. मात्र तरीही सरकारनं याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

पाच वेळा मा. उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करतंय. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकरांनी केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी 19 तारखेला दुपारी पंढरपूरला रवाना झाले. रात्री 9 च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग करत होते.