News

Ashish Shelar: ‘४० टक्के मुंबईकर आपोआप करोनामुक्त झाले; मग सरकारने काय केले?’

मुंबई: शहरातील तीन प्रभागांमध्ये झालेल्या अँटीबॉडी सर्वेक्षणातील निष्कर्षावरून भाजपने मुंबई महापालिका व राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. ‘मुंबईतील सुमारे ४० टक्के लोकांना करोना होऊन ते आपोआप बरे झाले असतील तर राज्य सरकारनं काय करून दाखवलं,’ असा रोकडा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी यांनी केला आहे.

मुंबई हे राज्यातील करोनाचे हॉटस्पॉट असून येथील रुग्णांची संख्या १ लाखांच्या पुढं आहे. करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नीती आयोग आणि खुद्द महापालिकेनं अलीकडेच महापालिकेच्या तीन प्रभागांमध्ये अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानुसार, झोपडपट्टीतील ५७ टक्के तर, इमारतींमधील १६ टक्के रहिवाशांना करोना होऊन गेल्याचं समोर आलं आहे. तर, एका खासगी लॅबच्या पाहणीनुसार आतापर्यंत २५ टक्के मुंबईकरांनी स्वबळावर करोनावर मात केली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की ४० टक्के मुंबईकरांना करोना होऊन गेला आहे. त्यांनी स्वबळावर त्यावर मात केली आहे. मग राज्य सरकार आणि महापालिकेनं केलं काय,’ असा सवाल शेलार यांनी केला आहे.

‘मुंबई महापालिका व राज्य सरकारने केलेले दावे साफ खोटे आहेत. झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयांचं निर्जंतुकीकरण केलं जावं. इमारतींचं सॅनिटायझेशन केलं जावं. किमान १ लाख मुंबईकरांची अँडीबॉडी टेस्ट करावी, अशा मागण्या भाजपनं केल्या होत्या. पण यापैकी काहीही केलं गेलं नाही. लोकांनी स्वत:च्या रोगप्रतिकारक शक्तीच्या बळावर आजारावर मात केली आहे. मग ‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी नेमकं काय केलं,’ अशी विचारणा शेलार यांनी केली आहे.

‘लोक स्वत: आजाराशी लढत असताना मुंबई महापालिकेनं प्रयत्न कमी पडू देऊ नयेत. लोकांचं यश स्वत:च्या नावावर खपवू नये. मुंबईत एक लाख अँटीबॉडी चाचण्या करा. सत्य समोर येईल,’ असंही शेलार यांनी म्हटलं आहे.