News

मग मला पाडून दाखवा, अजितदादांनी भर सभागृहात स्वीकारलं मुनगंटीवार यांचं चॅलेंज

मुंबई, 15 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या  (maharashtra winter assembly session 2020) दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा शाब्दिक सामना पाहण्यास मिळाला. सभागृहात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

राज्य सरकारने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी  पुरवणी मागण्या सादर केल्या. यावर सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले होते. यावेळी त्यांनी चौफेर टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांना चिमटे काढले. भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचे सांगितले असता,  ‘आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

त्यानंतर समोरच बसलेल अजित पवार  म्हणाले की, ‘तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा’ असा खुमासदार टोला लगावला. अजितदादांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकली.

पण, अजितदादांच्या खुमासदार विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनी गुगली टाकली.  ‘मुळात पडण्याचे दोन प्रकार आहे. एक लोकशाहीमध्ये आणि दुसरा 23 नोव्हेंबरचा आहे. हे आम्ही करून दाखवले आहे, असं काय करता दादा, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे’ असं मुनगंटीवार म्हणाले असता पुन्हा सभागृहात एकच हश्शा पिकली.

तसंच ‘राज्यातील प्रश्नांवर चर्चा होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणे होत नाही. त्यामुळे मी मेल मागवले. जेव्हा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा एक कर्मचारी हा संगणक पुसत होता. त्याला विचारले असता तो म्हणाला संगणक जरा ओलसर झाले आहे. त्यामुळे पुसत आहे. मुळात जनतेचे इतके मेल आले आहे की, संगणकालाही रडू फुटले आहे’ असा टोलाही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

तसंच, कोविड करता तुम्ही 50 कोटी आज देता. जी लोकं जीवाची पर्वा न करता काम केलं, जे मृत्युमुखी पडले त्यांना 10 दिवसांत अनुकंपा धोरणावर नोकरी दिली पाहिजे अशी मागणी केली होती, तुम्ही काय केले. तुम्ही केंद्राला पत्र पाठवलं.

जो येईल तो उठून म्हणून केंद्राने मदत करावी म्हणतो, इथे असं का रडता ? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. केंद्र काय मदत करत नाहीये का?  खोटं बोला पण सर्वांनी मिळूव बोला अशी नवी म्हण आली आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.