News

फेसबुक का करत आहे भारतात गुंतवणूक? मार्क झुकरबर्ग यांनी केलं स्पष्ट

मुंबई, 15 डिसेंबर: फेसबुकने (Facebook) आयोजित केलेल्या फ्युएल फॉर इंडिया 2020 (Facebook Fuel for India 2020) या कार्यक्रमात फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग (Facebook chief Mark Zuckerberg) आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) भारतातील व्यवसायाच्या संधी या विषयावर चर्चा केली. दोघांमध्ये भारतातील आर्थिक घटकांबाबत चर्चा झाली. त्याचप्रमाणे फेसबुककडून भारतामध्ये का गुंतवणूक केली जात आहे, यावर बोलताना फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी काही महत्त्वाची कारणं स्पष्ट केली आहेत.

यावेळी मार्क झुकरबर्ग यांनी रिलायन्स समुहाने संचालिक केलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती आणल्याचे म्हटले आहे. त्यांनी यावेळी असे स्पष्ट केले की, फेसबुक जगभरातील लोकांची मदत करण्यासाठी जिओ (Jio) बरोबर भागीदारीमध्ये काम करू इच्छित आहे.

फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन म्हणाले की, ‘आम्हाला फेसबुकची खरी कहाणी भारतात शेअर करायची आहे, ज्यामुळे लोकांना हे समजणं सोप होईल की आमचा प्लॅटफॉर्म वापरणारे लोकं आणि संस्थांद्वारे आम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहोत’.

दररोज डिजिटल जग कसे बदलत आहे यावर मार्क झुकरबर्ग यांनी त्यांचं मत मांडलं आहे.  झुकरबर्ग म्हणाले, ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची भूमिका महत्त्वाची आहे. डिजिटलायझेशनमुळे व्यक्तींचे सबलीकरण होण्यास मदत होईल, ज्यामुळे येत्या काही दशकात देशात समृद्धी होईल.

भारत आणि रिलायन्स जिओ मधील गुंतवणुकीचे कारण सांगताना मार्क झुकरबर्ग म्हणाले – ‘भारत महान आर्थिक संभावनांचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच फेसबुकने याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.’