महाराष्ट्र

मोठी बातमी! ‘या’ 4 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून देण्यात आला इशारा

11 Dece :- मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू होता. सध्या ढगाळ वातावरण आहे. तर पालघर-रायगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. पुढचे 48 तास राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 11 ते 15 डिसेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग इथे रिमझिम पावसाच्या सरी पडतील तर ढगाळ वातावरण असणार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

धुळे आणि नंदुरबार इथे गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस पावसाचा जोर जास्त असेल तर 13 ते 15 डिसेंबर दरम्यान पुन्हा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल. जळगाव जिल्ह्यात आज पावसाची शक्यता तशी कमी असली तर पुढील 24 ते 48 तासात मुसळधार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस पडेल. अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील 11 ते 15 डिसेंबर दरम्यान रिमझिम पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज आहे.

आज मुंबईसह उपनगरात आणि राज्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली होती. अचानक झालेल्या पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर कोरोना, लॉकडाऊन, महापुरातून सावरत असलेल्या शेतकऱ्यासमोर आता बदलत्या हवामानाचा फटका बसणार असल्यानं पुन्हा चिंतेचं वातावऱण आहे. अवेळी होणारा पाऊस आणि दमट हवामान यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी देखील चिंतेत आहे. काजू आणि फळबागांना आलेला मोहोर गळून पडण्याची शक्यता असल्यानं येत्या काळात शेतकऱ्यांसमोर समस्या निर्माण होऊ शकते.