बीड

पुन्हा येणाऱ्यांचे दिवस संपले, काँग्रेस मंत्र्याचा फडणवीसांना टोला

मुंबई, 08 डिसेंबर : शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदवरून (Bharat band) भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. ‘आम्ही येतो आम्ही येणार असे म्हणणार्‍यांचे दिवस आता संपले आहेत. आता परत कधी येणार नाही, असं त्यांनी म्हणावे’ असं म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना टोला लगावला आहे.

‘मोदी सरकारने केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. संपूर्ण देश हा शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल प्रकाश जावडेकरांनी पूर्ण वाचला नाही. या आयोगाच्या अनेक प्रमुख शिफारशी आमच्या सरकारने स्वीकारल्या होत्या. गुजरातमध्ये मोदींनी सांगितले होते की, msp ला धक्का लावला जाणार नाही. पण नव्या कायद्यात msp चा उल्लेख केलेला नाही’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

तसंच, ‘नव्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. किमान हमी भाव मिळाला पाहिजे.  हे सरकार भांडवलदारांच्या फायद्यासाठी काम करतं आहे. स्वामीनाथन आयोगाच्या 82 तरतुदी आम्ही स्वीकारल्या आहेत’ असंही वडेट्टीवार म्हणाले.

त्यानंतर वडेट्टीवार यांनी आपला मोर्चा फडणवीस यांच्याकडे वळवला. ‘आम्ही येतो आम्ही येणार असे म्हणणार्‍यांचे दिवस आता संपले आहेत. आता परत कधी येणार नाही, असं त्यांनी म्हणावं. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे पूर्ण बहुमत आहे, यांना आता संधी नाही’ असा टोलाही वडेट्टीवार यांनी फडणवीसांना लगावला.