News

उदयनराजेंनी ठाकरे सरकारबद्दल पुन्हा वर्तवलं भाकीत, म्हणाले…

सातारा, 01 डिसेंबर : ‘ठाकरे सरकारने (thackeray government) एका वर्षात काय केलं? हे मला दिसले नाही. लोकांची दिशाभूल केल्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही आणि लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येणार’ असल्याचा पुन्हा एकदा दावा भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale)  यांनी केला आहे.

साताऱ्यात पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पाहणीसाठी उदयनराजे भोसले पोवई नाक्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना पदवीधर निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

‘ठाकरे सरकारमध्ये एक वाक्यता नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येणार आहे, ते कसे येणार आहे, ते विचारू नका’ असं भाकीत पुन्हा एकदा उदयनराजे यांनी वर्तवलं आहे.

तसंच, ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये विस्काळीत पणा आला आहे. महाविकास आघाडी सरकार सांगत आहे की, आम्हाला एक वर्ष झाले आहे. पण, वर्षभरात काय काम केले आहे, ते काहीही दिसत नाही. उलट महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन काय कामं केली आहे, ते सांगावे’, असा खोचक टोलाही उदयनराजेंनी लगावला.

‘मला खात्री आहे महाराष्ट्रातील सर्व जागा भाजप जिंकणार आहे. हे तिन्ही पक्ष कधीच एकत्र नव्हते. फक्त सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले आहे. वेगवेगळ्या विचारांचे हे पक्ष एकत्र आले होते.   महाविकास आघाडीतील सर्व पक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी ताकदीचा वापर करावा लागत आहे.  त्यामुळे आपले स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर बाजूला होऊन जातील’, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर केली.

महाविकास आघाडी पक्षातील नेते जेव्हा आमदारकीला उभे राहतील तेव्हा अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. कारण, कुणालाच आपल्या मतदारसंघात याचा परिणाम व्हावा असं वाटणार नाही. लोकंही मदत करावी म्हणून पुढे येणार नाही, असंही उदयनराजे भोसले म्हणाले.