बीड

नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही

बईः राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनंतरही विरोधी पक्षानं हे सरकार अकार्यक्षण असल्याचे आरोप केले आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनीही हे सरकार उद्ध्वस्त करणार सरकार आहे, अशा शब्दांत सरकारवर हल्ला चढवला होता. राणेंच्या या टीकेला शिवसेना नेते अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

२८ नोव्हेंबरला राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली. सरकारच्या वर्षपूर्तीवर राज्यातील भाजप नेत्यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवत हे सरकार अकार्यक्षम असल्याचा दावा केला होता. त्यावर अनिल परब यांनीही भाजपवर निशाणा साधत पलटवार केला आहे. तसंच, नारायण राणेंच्या टीकेचा समाचारही त्यांनी घेतला आहे.

नारायण राणेंकडून सर्टिफिकेट घेण्याइतके आमचे वाइट दिवस आले नाहीयेत. त्यामुळं त्यांच्या सर्टिफिकेटला व त्यांच्या बोलण्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, असं म्हणत नारायण राणेंना फटकारलं आहे. शिवाय, सरकारने वर्षभर काम केलंय त्यामुळं विरोधक वैफल्यग्रस्त आहेत त्यांच्या मनाप्रमाणे झालेलं नाहीये त्यामुळं ते विरोध करत राहणारच, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

तसंच, कारशेडबाबत नारायण राणेंनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. ‘कारशेडच्या जमिनीबाबत आम्ही अभ्यास करुनच कांजूरला नेण्याचा निर्णय घेतला. कांजूरच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञ आहेत, असंही ते म्हणाले आहेत.