बीड

शांत, संयमी आहे, याचा अर्थ नामर्द नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला थेट इशारा

मुंबई: ‘महाराष्ट्रात सूडाचा विचार कधी रुजलेला नाही. राजकीय शत्रूचा काटा काढणं ही आमची संस्कृती नाही. पण तुमचं सूडचक्र आमच्या कुटुंबीयांवर, मुलाबाळांच्या अंगावर येणार असेल तर आमच्याकडंही सुदर्शनचक्र आहे. मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही,’ असा जबरदस्त इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्र सरकारला दिला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध ईडीनं केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. (CM Uddhav Thackeray warns BJP)

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत (Saamana Interview) घेतली आहे. राज्य सरकारच्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजकीय प्रश्नांनाही उत्तरं दिली आहेत. विशेषत: केंद्र सरकारकडून ईडी व सीबीआयसारख्या यंत्रणाच्या होत असलेल्या वापरावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे.

‘सध्याच्या सगळ्या घडामोडींवर माझं लक्ष आहे. राजकीय विरोधकांच्या कुटुंबीयांवर हल्ले करणे ही पद्धत महाराष्ट्रात तरी नाही. आमच्या कुटुंबीयांच्या अंगावर येणाऱ्यांनाही कुटुंबं आहेत हे त्यांनी विसरू नये. ते काही धुतल्या तांदळाचे नाहीत. त्यांची खिचडी कशी शिजवायची ते आम्हाला माहीत आहे. सूडानेच वागायचं तर आम्हीही वागू शकतो. पण हे विकृत बुद्धीचे चाळे आहेत. त्या मार्गाने जायची आमची इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिला.

‘राजकारण राजकारणासारखं केलं जायला हवं. सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल तर सत्ता सदासर्वकाळ कोणाकडे राहत नाही. आता आमच्याविरोधात राजकारण करणाऱ्यांवरही केसेस होत्या. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना वाचवलं होतं. त्याचं थोडं तरी भान त्यांनी ठेवावं,’ असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाणला.