बीड

रोहित पवारांकडून मोदींचे कौतुक, तर राज्यातील भाजप नेत्यांना दिला ‘हा’ सल्ला

नगर: देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेल्या कामाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. मात्र याचवेळी त्यांनी करोना वरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांनाही चांगलेच सुनावले आहे.

करोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी जी २० परिषदेत जागतिक नेत्यांना केले होते. याबाबतची माहिती ट्विटवर देतानाच यावरूनच रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

पवार यांनी म्हंटले आहे,’गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. तसंच करोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी जी २० परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला,’ असे स्पष्ट करतानाच पवार यांनी सातत्याने करोनावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांनाही सुनावले आहे.

‘मोदी यांनी करोना या संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील,’ असे मतही त्यांनी मांडले आहे.