बीड

मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

मुंबई, 20 नोब्हेंबर: दिवाळीनंतर (Diwali) कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा उद्रेक झाल्याने मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai municipal Corporation) मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (23 नोव्हेंबर) मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही शाळा (Mumbai School) सुरू होणार नाही. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळा बंदच राहातील, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असताना 23 नोव्हेंबर शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता.

याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मतं जाणून घेतली होती. त्यानंतर महापालिकेकडे पाठपुरवा देखील केला होता. त्यानंतर महापालिकेने शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईत एकही शाळा सुरू होणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.

मार्च महिन्यापासून राज्यातली शाळा कॉलेजेस बंद असून Online अभ्यास सुरू आहे. दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाले शिक्षणमंत्री?

दुसरीकडे, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरू करत आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून सांगणार स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे हे ठरवून निर्णय घ्यावा. पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असं बंधन नसणार आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांना अॅटेन्डेन्स मार्क्स यावर परिणाम नाही, असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यात 43 शाळा सुरू करण्याची तयारी

दरम्यान, पुणे महापालिकेकडून राज्यशासनाच्या आदेशानुसार, माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वीच धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठ येथील उर्दू शाळेच्या शिक्षकास कोरोनाची लागण झाली आहे.