राजकारण

… तर माध्यमांची अडवणूक का? हाथरस घटनेवरून राऊतांचा सवाल

मुंबईः हाथरस घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. माध्यमांना हाथरसमध्ये जाण्यास व वार्तांकन करण्यापासून रोखल्यानंतर देशातील राजकारण तापले आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा योगी सरकारला धारेवर धरलं आहे.

हाथरस येथील १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अडवल्यानंतर योगी सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमानांही हाथरसला जाण्यापासून रोखण्यात आलं होतं, यावरून संजय राऊत यांनी माध्यमांना तिथे जाण्यापासून का रोखलं जात आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.

‘मला कळत नाही माध्यमांना का अडवण्यात आलं? जर सरकारनं काहीच चुकीचं केलेलं नाही, तर या प्रकरणातील तथ्य बाहेर काढण्यासाठी माध्यमांना हाथरसला जाऊ दिले पाहिजे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र सामनातून योगी सरकार व भाजपवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केली तेव्हा संपूर्ण भाजप हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे. ‘उत्तर प्रदेशात रामराज्यवगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत जंगलराज आहे. महिलांवर आत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार व खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.