राजकारण

हाथरस गँगरेप : मुख्यमंत्री योगी म्हणतात, ‘समूळ नाश सुनिश्चित…’

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात महिलांविरुद्ध वाढत्या अत्याचारांनी कळस गाठल्याचं गेल्या काही महिन्यांतून घडलेल्या घटनांतून स्पष्टपणे दिसून येतंय. यानंतर देशभरातून योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली जातेय. हाथरस, बलराममपूर आणि भदोही या जिल्ह्यांसोबतच आणखी काही ठिकाणी मुलींवर बलात्कार आणि क्रूर हत्येची प्रकरणं समोर आल्यानंतर जनतेतही आक्रोश दिसून येतोय. यामुळे दोषींवर कारवाई करण्यासाठी योगी सरकारवर दवाब वाढलाय. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘माता-भगिनींवर अत्याचार करणाऱ्यांचा विचारही करणाऱ्यांचा समूळ नाश सुनिश्चित असल्याचं’ सोशल मीडियावर म्हटलंय. त्यामुळे अनेकांचं लक्ष आता योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश प्रशासनाच्या कारवाईकडे लागलंय.

‘उत्तर प्रदेशात माता – भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला इजा पोहचवण्याचा विचारदेखील करणाऱ्यांचा समूळ नाश सुनिश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एका उदाहरण प्रस्तुत करेल. तुमचं उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता – भगिनीच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी संकल्पबद्ध आहे. हाच आमचा संकल्प आहे. वचन आहे’ असं योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

कायदे-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

उल्लेखनीय म्हणजे, उत्तर प्रदेशातल्या गँगस्टर विकास दुबे प्रकरणानंतरही राज्यातील कायदे व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगलेली दिसली. या प्रकरणातील अनेक आरोपींचा मृत्यू फिल्मी स्टाईल पोलीस एन्काऊन्टरमध्ये झाल्यानंतर यावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली होती. त्यामुळेच योगींच्या ‘समूळ नाश सुनिश्चित…’ असल्याचं वक्तव्य काय इशारा करतंय? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

एसआयटीचा तपास

दरम्यान, हाथरस बलात्कार प्रकरणात प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी प्रवीण कुमार आणि पोलीस अधिक्षकांविरुद्ध कारवाई होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. हे प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळण्यात आलं, त्यावर योगी आदित्यनाथ भलतेच नाराज झाल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष तपासणी पथकही (एसआयटी) गठीत केलंय.

कुटुंबीयांना प्रशासनाकडून धमक्या

उल्लेखनीय म्हणजे, जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांच्यावर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मृत मुलीच्या कुटुंबीयांना धमकावण्याचे आणि दबाव टाकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण मिटवण्याचं सांगतानाच मीडिया निघून जाईल पण प्रशासन मात्र इथंच राहील, असं पीडित कुटुंबीयांसमोर म्हणत असल्याचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

‘बलात्कार झालाच नाही’

उत्तर प्रदेश पोलिसांकडून मृत पीडितेवर कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध अर्ध्यारात्रीच अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याचाही आरोप पीडित कुटुंबीकडून करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ‘पीडितेचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात यायला हवं होतं’ असं म्हणत या आरोपावर शिक्कामोर्तबच केलंय. या आरोपांमुळे प्रशासनाच्या वर्तवणुकीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. इतकंच नाही तर, फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या रिपोर्टमध्येही पीडितेवर बलात्कार झाल्याचे पुरावे आपल्याला मिळालेच नसल्याचंही अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (कायदा व सुव्यवस्था) म्हटलंय.

१४ सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये पीडित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, बलात्कारानंतर तरुणीची जीभ छाटण्यात आली होती तसंच तिच्या पाठीच्या मणकाही तोडण्यात आला होता. गेल्या सोमवारी प्रकृती बिघडल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी तिनं अखेरचा श्वास घेतला.