देश विदेश

गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विधेयके मंजूर, पंतप्रधान मोदी म्हणतात…

नवी दिल्ली : ‘शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषीसेवा करार विधेयक २०२०’ आणि ‘कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०’ ही दोन विधेयके लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आलीय. राज्यसभेत विरोधकांच्या गोंधळादरम्यान आवाजी मतदानाद्वारे ही विधेयके मंजूर करून घेण्यात आली. ही विधेयके संमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांचं अभिनंदन केलंय. या विधेयकामुळे शेतकऱ्यांची दलालांच्या तावडीतून सुटका होणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय.

‘भारताच्या कृषि इतिहासात आज एक मोठा दिवस आहे. संसदेत महत्त्वाची विधेयके मंजूर होण्यासाठी मी आपल्या परिश्रमी अन्नदात्यांना शुभेच्छा देतो. यामुळे केवळ कृषि क्षेत्रातच अमुलाग्र बदल घडणार नाही तर यामुळे अनेक शेतकरी सशक्त होतील. दशकांपासून आपले शेतकरी बंधू-भगिनी अनेक प्रकारच्या बंधनांत अडकले होते आणि त्यांना अनेक दलालांचा सामना करावा लागत होता. संसदेत ही विधेयके मंजूर झाल्यानं अन्नदात्यांची आता या सर्वांतून मुक्तता झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि त्यांची समृद्धी सुनिश्चित होईल’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलाय.

‘मी अगोदरही म्हटलं आणि पुन्हा एकदा सांगतो की हमीभावाची (MSP) व्यवस्था सुरूच राहील. सरकारी खरेदीही सुरू राहील. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी हरएक संभव प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगलं जीवन सुनिश्चित करू’ असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.

या अगोदर पंतप्रधानांनी विरोधकांवर कृषि विधेयकांबद्दल शेतकऱ्यांत भ्रम फैलावण्याचा आरोप केला होता. तर ‘विधेयकांवर चर्चा सरकारला नकोय. त्यांना केवळ लवकरात लवकर ही विधेयकं मंजूर करायची आहेत. ही विधेयकं आणण्यापूर्वी विरोधकांशी संवाद साधणं गरजेचं होतं. करोनाच्या नावावर अध्यादेश काढले गेले. सरकारनं भारतीय मजूर संघालाही विश्वासात घेतलेलं नाही’ अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली.