बीड

हे सरकार आहे की ईस्ट इंडिया कंपनी?; आशिष शेलारांचा टोला

मुंबई: निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवरून भाजपनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरूच ठेवली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा दाखला देत भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी राज्यातील सरकारला ईस्ट इंडिया कंपनी म्हणून हिणवले आहे.

कंगना राणावत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राज्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. शिवसेनेनं कंगना राणावत हिच्या विरोधात आघाडी उघडली होती. कंगना व तिचे समर्थकही ठाकरे सरकारवर टीका करत होते. त्याच दरम्यान निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे एक व्यंगचित्र सोशल मीडियात शेअर केले. त्यामुळं संतापलेल्या शिवसैनिकांनी मदन शर्मा यांना गाठून मारहाण केली होती. माजी सैनिकाला झालेल्या मारहाणाची हा मुद्दा उचलत विरोधी पक्ष भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन लगेचच जामिनावर सोडून दिले.