राजकारण

अजितदादांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, भाजप नेत्याची जाहीर खंत

मुंबई, 08 सप्टेंबर : विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे. या निवडणुकीत झालेला पराभव हा भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी थेट अजित पवारांच्या पायगुणालाच दोष दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, अशी खंतच प्रवीण दरेकर  यांनी बोलून दाखवली आहे.

नीलम गोरे यांची उपसभापतीपदी निवडीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अजित पवार बोलायला उभे राहिले होते. ‘उपसभापती निवडणूक बिनविरोध व्हावे गरजेचे असते, या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. पण भाजपने तसे केले नाही’, असं म्हणत अजित  पवार यांनी विरोधकांना टोला हाणला.

‘नीलम गोऱ्हे यांचा पायगुण चांगला आहे. कारण त्या आा उपसभापती झाल्या आहे आणि महाविकास आघाडी सरकार आले आहे’, असं अजित पवार यांनी विधानसभेत  सांगितले होते. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी आपली खंत बोलून दाखवली.

तसंच अजित पवारांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन केले आहे.  ‘मागील सरकारमध्ये त्या मंत्री होतील पण तसं झालं नाही. महाविकास आघाडी सरकार आल्यावर मंत्री म्हणून विचार होईल वाटले होते, पण झाले नाही, पण गोऱ्हेताई उपसभापतीपद महत्त्वाचे आहे. तुम्ही या पदावरून न्याय देऊ शकता. सीएम ठाकरे यांचे तुमच्याकडे लक्ष आहे. पक्ष नेतृत्व तुम्हास संधी दिली’ असं म्हणत अजितदादांनी अभिनंदन केले.

विशेष म्हणजे, प्रवीण दरेकर यांनी उपसभापतीपदाची निवडणूक होऊ नये म्हणून बराच प्रयत्न केला. सोमवारी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आणि आज थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. भाजपकडे संख्याबळ नसतानाही निवडणूक रद्द करण्याची खेळी केली. परंतु, शिवसेनेनं भाजपचा हा डाव हाणून पाडला. उपसभापतीपदावर याआधी नीलम गोऱ्हे यांचीच निवड झाली होती. आता पुन्हा एकदा याच पदावर गोऱ्हे यांची निवड झाली आहे.