बीड

‘आंतरराष्ट्रीय मीडियाने Facebook, Whatsappची केली ‘पोलखोल’; दोषींवर कारवाई करा’

नवी दिल्ली: फेसबुकवरून (Facebook) भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षात शाब्दिक युद्ध सुरूच आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी आज मंगळवारी पुन्हा एकदा आरोप करत फेसबुक आणि व्हॉट्सअॅप देशातील लोकशाही आणि सामाजिक सौहार्दावर हल्ला (assault on indian democracy) करत असल्याचे म्हटले आहे. या पूर्वी काँग्रेसने फेसबुकने भाजप नेत्यांच्या ‘हेट स्पीच’कडे कथित दुर्लक्ष केल्याप्रकरणी मार्क झुकरबर्ग (mark zuckerberg) यांना पत्र लिहिले होते गेल्या १५ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा काँग्रेसने या प्रकरणी पत्र लिहिले आहे.

राहुल गांधी यांनी अमेरिकी वर्तमानपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ची बातमी ट्विट केली होती. आंतरराष्ट्रीय मीडियाने भारतातील लोकशाही आणि सामाजिक सौहार्दावर फेसबुक आणि व्हॉट्सअपचे हल्ले पूर्णपणे उघड केले आहेत, असे राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये लिहिले होते. आमच्या देशातील प्रकरणांमध्ये कोणालाही, मग त्या परदेशी कंपन्या असल्या तरी देखील, हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. याची तत्काळ चौकशी होऊन दोषींना शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील वर्तमानपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास (Ankhi Das) यांच्यासंदर्भात काही दावे केले आहेत. या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अंखी दास यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पोस्टद्वारे सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाचे समर्थन केले आहे.

दास यांनी सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याची प्रशंसा करत एका पोस्टमध्ये लिहिले होते की,’शेवटी, ३० वर्षांच्या परिश्रमामुळे भारताला राज्य समाजवादापासून मुक्ती मिळाली आहे.’ या सर्व पोस्ट २०१२ ते २०१४ च्या दरम्यानच्या आहेत आणि या पोस्ट फेसबुक कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ग्रुपमध्ये पोस्ट करण्यात आल्या होत्या. यात कंपनीचे शेकडो कर्मचारी आहेत.