बीड

आंबेडकरांच्या मंदिर आंदोलनाला यश; आता आठवलेंचं ९ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. ८ सप्टेंबरपर्यंत धार्मिकस्थळं सुरू न केल्यास ९ सप्टेंबररोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली. आता मात्र अनलॉक सुरू झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेत प्रबोधन झाले असल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन सुरक्षेचे नियम पाळून येत्या ८ सप्टेंबरपर्यंत मंदिर, मस्जिद, चर्च, बुद्धविहार, गुरुद्वारा आणि देरासार अशी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत अन्यथा ९ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू केल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढेल असे नाही. आता अनलॉकचे नियम जाहीर झाले असून आतापर्यंत मॉलला उघडण्यासही परवानगी दिली आहे. १०० लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमांना केंद्र सरकारने परवानगी दिल्याची मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी सुरक्षेचे नियम, फिजिकल डिस्टन्स पाळून, पोलीस बंदोबस्त ठेवून सकाळी ८ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व धर्मीयप्रार्थनास्थळे येत्या ८ सप्टेंबरपर्यंत सुरू करावीत, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून जर ८ सप्टेंबरपर्यंत सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू केली नाहीत तर रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर आंदोलन छेडण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील मंदिरं सुरू करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पंढपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याच्या आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात १ लाख वारकरी सामिल होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. आंबेडकर यांच्या कालच्या आंदोलनात एक लाख वारकरी सहभागी झाले नव्हते. मात्र, वारकऱ्यांसह हजारो लोकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपुरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पंढरपूरला येणारी एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. तसेच मंदिराभोवती दहा फूट उंच बॅरिकेट्स लावण्यात आल्या होत्या. मात्र, आंदोलनात हजारो लोक सहभागी झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. गर्दीमुळे पंढरपूर परिसरात रेटारेटी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. या पार्श्वभूमीवर जमावबंदी असतानाही हे आंदोलन झाल्याने पंढरपूर पोलिसांनी काल उशिरा आंबेडकरांसह १२ प्रमुख नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच इतर दीड हजार कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.