बीड

भारतीय जनता पक्ष इतका दांभिक कसा?; काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई: राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा काँग्रेसनं खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. मोदी सरकारच्या सहा वर्षांच्या राजवटीतील काही दाखले देत ‘भारतीय जनता पक्ष इतका दांभिक कसा,’ असा सवाल काँग्रेसनं केला आहे.

उत्तर प्रदेशच्या आझमगड येथील बांसा गावात एका दलित सरंपचाचा अलीकडेच खून झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीन राऊत हे बांसा गावाला भेट देणार होते. त्यांच्या या दौऱ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. महाराष्ट्रात लोक वाढीव वीज बिलांमुळे त्रासलेले असताना ऊर्जामंत्री यूपीत काय करतात, असा पाटील यांनी केला होता. आपल्या नेत्यांना कार्यतत्परता दाखवण्यासाठी त्यांची ही धडपड आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला यासाठी आमदार व मंत्री बनवले नाही. नेतागिरीच करायची असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या, असं पाटील यांनी नितीन राऊत यांना सुनावलं होतं.

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी पाटील यांच्या या ट्वीटला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. ‘पंतप्रधान मोदी मागच्या सहा वर्षांत अर्धा काळ प्रचारमंत्री म्हणून देशातील प्रत्येक राज्यात फिरत होते, त्याच वेळी देश आर्थिक डबघाईस जात होता. देशाला नोटांबदीच्या संकटात टाकून १२५ लोक लाइनमध्ये मेल्यानंतरही मोदी विदेश दौऱ्याला गेले. ट्रम्प यांना नमस्ते करण्यासाठी व मध्य प्रदेशचे सरकार पाडण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा पुढे ढकलून देशाला करोनाच्या संकटात ढकलले आणि तुम्ही नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यास आक्षेप घेता?,’ असं आश्चर्य सावंत यांनी व्यक्त केलं आहे.

‘मागील सहा वर्षांत देशात दलितांवर हल्ले वाढले. दलित समाजाने आंदोलनही केले. पण मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेंना पाठीशी घालणाऱ्या तुमच्या पक्षाला आता दलित समाज आठवला? पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हा तुम्ही महाजनादेश यात्रा काढत होता. पूरग्रस्तांनी जाब विचारल्यावर त्यांना अरेरावी करून गप्प बसवणाऱ्यांनी आता उपदेश द्यावा. देश करोनाच्या संकटाशी लढत असताना बिहारमध्ये प्रचार करणाऱ्या भाजपनं इतरांना उपदेश द्यावा हे आश्चर्य आहे,’ असा खोचक टोलाही सावंत यांनी हाणला आहे.