बीड

मोठी बातमी! ‘त्या’ व्यक्तींकडूनही कोरोना पसरण्याचा जास्त धोका, मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

मुंबई, 22 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाबाधित 80 टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यांच्याकडून कोरोनाचा धोका पसरण्याचा जास्त धोका आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने डोंबिवली जिमखान्यातील बास्केटबॉल हॉलच्या जागेत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कोरोनाच्या परिस्थितीत आणखी सतर्क राहण्याचे आवाहन केले.

राज्यात जेव्हा कोरोनाचे रुग्ण सापडत होते. तेव्हा फक्त राज्यभरात कोरोनाची चाचणी करण्यासाठी दोनच लॅब होत्या. पण, आता राज्यात 285  कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यात आल्या आहे, असं सांगून उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाची पाठ थोपाटली.

दरम्यान, श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत. मात्र, यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेश आगमनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘सण आणि उत्सवांची बदलेली रूपे आपण पाहिली आहेत, यातील काळानुरूप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कोरोनामुळे जिथे सगळे जग हादरून गेले आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी’, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

गणेश मंडळाचे मानले मुख्यमंत्र्यांनी आभार

काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन व आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे. ‘गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी  सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश हाती घ्यावा तसेच मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास अधिक सोयीचे होईल. शासनाने घालून दिलेले नियम पाळत असल्याबद्द्ल मुख्यमंत्र्यांनी या मंडळांना धन्यवाद दिले आहेत.