बीड

भारतातील कोरोना लशीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली गूड न्यूज

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : भारताची कोरोना लस (corona vaccine) ह्युमन ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या लशीकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. ही लस कधी मिळणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. आता अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Health minister Dr. Harsh vardhan) यांनी ही लस कधी मिळणार याची माहिती दिली आहे. या वर्षाअखेरपर्यंतच मेड इन इंडिया कोरोना लस उपलब्ध होईल, असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भारतातील कोरोना लशीबाबत माहिती दिली आहे.

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “जगभरात कोरोना लशीचं ट्रायल फास्ट ट्रॅक केलं जातं आहे. भारतातील लशींचं ट्रायल 2020 वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. 2021 च्या पहिल्या तिमाही लशीचा वापर करण्यासाठी आपण तयार असू शकतो”

“भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन वर्षाच्या शेवटपर्यंत उपलब्ध होईल. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने करार केला आहे. त्यामुळे ही लस यशस्वी झाली तर भारताला स्वस्त दरात हे औषध उपलब्ध करून दिलं जाईल. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आधीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीचं उत्पादन करत आहे, जेणेकरून कमीत कमी वेळेत ही लस बाजारात उपलब्ध करून देता येईल.भार बायोटेकप्रमाणे सीरम इन्स्टिट्युसहदेखील असाच करार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे”, असंही ते म्हणाले.

लशी बाजारात आणण्यासाठी कमीत कमी एक महिना आणखी लागेल. लस उपलब्ध होताच सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल, त्यानंतर वयस्कर व्यक्त आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना दिली जाईल. त्यानंतर उपलब्ध डोसनुसार सर्वांचं लसीकरण केलं जाईल, असं डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यानं दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे, तर 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत  68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गेल्या 20 दिवसांत जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत होती मात्र एका दिवसात आज दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 24 तासांत 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के आहे.