News

मुंबईतील ‘ही’ मंदिरे उघडण्याची सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

नवी दिल्ली: मुंबईत (Mumbai)पर्यूषण काळात (Paryushana Festival) तीन जैन मंदिरे (Jain Temple) उघडण्याची सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. आम्ही दरम्यानच्या काळात करोनाबाबत काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी, तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू याची हमी या तीन मंदिरांनी द्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने या मंदिरांना दिली आहे. दादर, भायखळा आणि चेंबूर परिसरातील ही मंदिरे २२ आणि २३ ऑगस्टला उघडण्यात येतील. राज्य सरकारने राज्यात मॉल्स आणि इतर आर्थिक व्यवहार सुरू करण्याची अनुमती दिलेली असताना मंदिरांना मात्र अनुमती दिलेली नाही यावरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील सरकार प्रत्येक व्यवहार सुरू कऱण्यासाठी परवानगी देत आहे, यात पैसा देखील अंतर्भूत आहे, मात्र असे असतानाही मंदिरे खुली करण्याची वेळ येते तेव्हा सरकार कोविड असल्याचे सांगते, असे सरन्यायाधीश एस. एस. बोबडे यांच्या नेतृत्वातील पीठाने म्हटले आहे. आजची स्थिती गतिशील असून वास्तविक पाहिले असता हे गंभीर प्रकरण आहे, असेही बोबडे यांनी म्हटले आहे. जर आपण मानक संचालन प्रक्रिया (Standard operating procedure) लागू करू शकता, तसेच आपण सुरक्षेच्या उपायांचे पालन करत आहात, तर मग व्यवहार का सुरू होऊ नयेत. आम्ही याला प्रतिकूल खटवेबाजी म्हणू शकत नाही. हा विचार समुदायाच्या लोकांचा विचार करतो, असे कोर्टाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, ‘जर मंदिरात एकाचवेळी पाच लोकांना परवानगी देण्याबाबत चर्चा झाली असेल आणि सर्व ठिकाणी हा नियम लागू होऊ शकल्यास जैन मंदिरांच्या पलीकडे या नियमाची व्याप्ती वाढविण्यास आमचा विरोध नाही. मग अशी परवानगी हिंदू मंदिरांना का नाही, मुस्लिम धार्मिक स्थळांना का नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.’ या वेळी कोर्टाने जगन्नाथ रथ यात्रेचा हवाला दिला.

या दरम्यान केंद्राच्या वतीने एसजी तुषार मेहता यांनी बाजू मांडली. एमएचए आणि एमओईएफच्या मार्गदर्शक तत्त्वे धार्मिक व्यवहारांना थांबवा असे सांगत नाही. सुरक्षेच्या उपयांचे पालन करत धार्मिक व्यवहार सुरू राहू शकतात. मात्र या काळात कोणताही धार्मिक मेळाव्याचा कार्यक्रम करता येणार नाही, असे मेहता म्हणाले.