महाराष्ट्र

संतापजनक! उपचार न भेटल्याने 2 निरागस बालकांना मृत्युने कवटाळलं

11 Aug :- कोरोना विषाणूच्या महाभयंकर कहारामुळे मानवी आयुष्य पार विस्कळीत आणि उध्वस्त झाले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे रुग्णांना रुग्णालयातच जागा मिळने कठीण झाले आहे. यामुळे रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याने स्वतःचे प्राण गमवावे लागत आहेत. खासगी रुग्णालयात रुग्णावर उपचार करण्याचे निर्देश दिलेले असताना खासगी रुग्णालयात रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नसल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना भिवंडीमध्ये घडली आहे.

शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी शहरातील कल्याणरोड येथील अफसरा टॉकीज परिसरात असलेल्या फिजा बेकरी येथे राहणाऱ्या जमशेद अंसारी यांचा 14 महिन्यांचा मुलगा हाशिर हा पाण्याच्या टब मध्ये पडल्याने त्याला दुखापत झाली होती . तर याच दिवशी याच परिसरात राहणारे गौस शेख यांचा 3 महिन्यांचा मुलगा सैफ याची मालिश करीत असताना त्याने उलटी केली होती. 14 महिन्यांच्या हाशिर व अवघ्या 3 महिन्यांचा सैफ या दोघांनाही त्यांच्या पालकांनी शहरातील विविध ८ खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी फिरवले. मात्र एकाही खासगी रुग्णालयाने या मुलांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही.

काही खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन नसल्याचे कारण दिले तर काहींनी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा नसल्याचे कारण दिले. शेवटी खासगी रुग्णालयांमध्ये फरफट करून या दोन्ही परिवारांचा विनाकारण व्यर्थ वेळ गेला . त्यानंतर रात्री 12 वाजे दरम्यान या दोन्ही बालकांना त्यांच्या नातेवाईकांनी धामणकर नाका येथे महापालिकेने ताब्यात घेतलेल्या ऑरेंज या खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी या दोन्ही बालकांना मृत घोषित केले.

खासगी रुग्णालयांना या बालकांवर उपचार केले नाही ही गंभीर बाब असून महापालिकेने या आठही रुग्णालयांवर त्वरित कारवाई करून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा अन्यथा महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या भिवंडी शहर अध्यक्षा स्वाती कांबळे यांनी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.