Uncategorizedराजकारण

अशोक चव्हाणांना आरक्षण समितीवरून हटवा; मराठा आंदोलक आक्रमक

पुणे: मराठा आरक्षणा संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना काहीच कळत नाही. त्यामुळे त्यांना या समितीवरून तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी करतानाच जोपर्यंत चव्हाणांना हटवण्यात येत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चव्हाण जिथे जातील तिथे टाळ वाजवून जागरण आंदोलन करणार असल्याचा इशारा मराठा समन्वय समितीने दिला आहे.

मराठा समन्वय समिचीची आज बालगंधर्व येथे एक बैठक पार पडली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी रस्त्यावर उतरून टाळ वाजवत गोंधळ-जागरण आंदोलन केलं. यावेळी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेही उपस्थित होते. मेटे यांनी यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारचे मराठा आरक्षणाकडे जबाबदारी नाही. सरकारमध्ये समन्वय नाही. अशोक चव्हाणंना या प्रकरणातील काहीही कळत नाही. त्यामुळे चव्हाण यांना समितीवरून हटवण्यात यावं, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.

मराठा आरक्षण कोर्टात टिकावं किंवा मराठा आरक्षणाच्या बाजूने न्याय मिळावा यासाठी चव्हाण गंभीर नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजप-शिवसेना सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र, सध्याचं शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही, असंही त्यांनी सांगितलं. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या सरकारला गोंधळ-जागरणातून जाग आणून दिली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण जिथे जिथे जातील तिथे तिथे जागरण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मेटे यांनी दिला. पुण्यात बालगंधर्व येथे मराठा आंदोलकांनी टाळ वाजवून जागरण आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला. तर औरंगाबादमध्येही मराठा क्रांती मोर्चाने जोरदार आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला.