बीड

उद्धव ठाकरेंच्या हाती स्टिअरिंग; पण जायचे कुठे हे मागे बसलेले ठरवतात; फडणवीसांचा घणाघात

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या रिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. पण कुठे जायचं हे ते ठरवत नाहीत. त्यांच्या मागे बसलेले दोघेजण कुठे जायचं हे ठरवतात, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणतात माझ्या हातात सरकारचं स्टिअरिंग आहे. हो मान्य आहे. स्टिअरिंग तुमच्याच हाती आहे. पण जायचं कुठे हे मागे बसलेले ठरवतात, अशी टीका फडणवीस यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आई भवानी त्यांना दीर्घायुष्य देवो, अशी कामनाही केली.

राज्य सरकार पडणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केलं. आम्हाला हे सरकार पाडण्यात कोणताही इंटरेस्ट नाही. या आधीही मी हे स्पष्ट केलंच आहे. सरकार पाडण्याचं सोडा, तुम्ही सरकार चालवून तर दाखवा, असं आवाहन देतानाच हे सरकार प्रचंड अंतर्विरोधाने भरलेलं आहे. एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहे. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही तर धोकेबाजी करून निवडून आलेलं सरकार आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

आम्ही विरोधी पक्षात आहोता. आमची भूमिका आम्हाला माहीत आहे. तुमची दिशा चुकत असेल तर त्या चुका जनतेसमोर आणण्याचं आमचं काम आहे, असंही ते म्हणाले. हे सरकार पुण्यावर लक्ष देत नाही, पिंपरी चिंचवडला मदत देत नाही. तुम्ही जर मदत केली नाही तर लोकांना खूप अडचण आहे. आम्ही सरकारच्या सोबत आहोत मात्र ही लपवालपवी थांबवा, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं.

यावेळी त्यांनी भाजपचे ३० कार्यकर्ते करोनाच्या संकटाला बळी पडल्याचं सांगितलं. करोनाचं कितीही संकट असलं तरी देशसेवा आणि जनसेवा करत आम्ही पुढेच जाणार, असं ते म्हणाले. राज्यातील करोना रुग्णांच्या टेस्टिंगची संख्या वाढवण्याचं सांगतानाच सेकंड वेव्ह आली नाही तर एका महिन्यात मुंबईतील करोना परिस्थिती आटोक्यात येऊ शकते, असंही ते म्हणाले.