महाराष्ट्र

खुदा होऊ नका! प्रकाश आंबेडकरांनी केले मुख्यमंत्र्यांना आवाहन

27 जुलै :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोना विषाणूचे वाढते संक्रमन राज्यावरील मोठे संकट गडद करत आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील लॉकडाऊन हटविण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना मृत्यूदर कमी करण्याच्या केलेल्या दाव्यावर आंबेडकरांनी तिरकस टिका केली आहे. मुख्यमंत्र्यांना टोला लगावतांना आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना असे दावे करून स्वत: ‘खुदा’ बनू नका, असं सुनावलं आहे.आंबेडकरांनी आता कोरोनाची भिती न बाळगण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. यासाठी त्यांनी यासंदर्भात भारतातील कोरोनासंदर्भात ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा दाखला दिला आहे. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील, अशी भिती आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन वाढवू नका, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आंबेडकरांनी यासंदर्भात सरकारला केलेल्या आवाहनात भगवान गौतम बुद्धांच्या वचनाचाही दाखला दिला आहे. ते म्हणाले की, बुद्धांनी एक सत्य वचन सांगितले आहे की, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे. आंबेडकरांनी सरकारला विनंती करतांना म्हटले की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे. तरच माणसं जगतील अन्यथा उपासमारीने मरतील अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन राज्यात वाढवु नका, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला केलं आहे.