News

सावध राहा, कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही! PM मोदींनी जनतेला केलं आवाहन

नवी दिल्ली, 26 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी कारगिल विजयाच्या 21व्या वर्धापन दिनी शहीद जवानांचे स्मरण केले. तसेच पाकिस्तानवर निशाणा साधत, भारत पाकिस्तानशी मैत्री करण्यास तयार होता, मात्र पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला. पण या युद्धात विजय आपलाच झाला. यावेळी मोदींनी देशातील सध्याची परिस्थिती यावर भाष्य केले, तसेच 10वीच्या परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला.

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केले. मोदी म्हणाले की, “भारताचा रिकव्हरी रेट हा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तर मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. मात्र असे असले तरी, कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे. आपल्याला खूप जास्त सावधान रहावे लागणार आहे. कोरोना अजूनही तेवढाच धोकादायक आहे, जेवढा आधी होता. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे”. देशात गेल्या 24 तासांत 48 हजार हून अधिक कोरोना रुग्ण सापडले. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 13 लाखांहून अधिक झाली आहे.

मोदींनी पाकिस्तानवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, कारगिल युद्धात ज्या परिस्थितीत झाला ती परिस्थितीत भारत कधीही विसरू शकत नाही. पाकिस्तानने भारतातील जमिन हडपण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते कधीच यशस्वी झाले नाही. मोदी असेही म्हणाले की, विनाकारण प्रत्येकापासून शत्रुत्व घेणे हा दुष्टांचे स्वभान असतो. पाकिस्तानही असेच करत होता.