राजकारण

फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

25 July :- राज्यात सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक होत चालला आहे.मुंबईमध्ये कमी होणाऱ्या चाचण्यांमुळे मृत्यूदर वाढतो आहे.तातडीने चाचण्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची गरज आहे, याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मुंबईतील चाचण्यांची संख्या कमीच आहे, याकडे लक्ष वेधताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 23 जुलै 2020 पर्यंत मुंबईत 4 लाख 62 हजार 221 चाचण्या झाल्या आहेत, तर 23 जुलैपर्यंत पुण्यात 3 लाख 54 हजार 729 चाचण्या झाल्या आहेत. अगदी 17 ते 23 जुलै या आठवड्याचा विचार केला तर 41 हजार 376 चाचण्या मुंबईत झाल्या आहेत. तर याच कालावधीतील पुण्याच्या चाचण्या 85 हजार 139 इतक्या आहेत.याचाच अर्थ मुंबईपेक्षा दुप्पट चाचण्या पुण्यात झाल्या आहेत. पुण्यापेक्षा कितीतरी अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईतील चाचण्या अतिशय कमी होत आहेत.

1 ते 23 जुलै या काळात मुंबईत 1 लाख 28 हजार 969 चाचण्या झाल्या आहेत. या 23 दिवसांची सरासरी काढली तरी ती 5607 इतकी येते. मुंबईत कमी चाचण्या करणे हे मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्यासारखे होईल. याचा थेट परिणाम हा मृत्यूदरावर होतो आहे. पुण्याचा मृत्यूदर 2.39 टक्के असून, मुंबईचा मृत्यूदर हा 5.60 टक्के झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर हा 3.68 टक्के असून मुंबईचा मृत्यूदर आटोक्यात न येण्याचे एकमात्र कारण हे कमी संख्येने होणार्‍या चाचण्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.