News

मुंबई हादरली; गटारीला पित होते दारू, वाद झाला आणि चौघांनी तलवारीने वार करून संपवलं!

मुंबई, 20 जुलै : मुंबईतील विद्याविहार येथील बंजारा वस्तीत दारु पिण्याच्या वादातून चार जणांनी एका तरुणावर चाकू आणि तलवारीने हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

जितू गागडा असं मयत तरुणाचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीळ गेल्या आठ दिवसातली ही तिसरी हत्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीत बंजारा वस्ती येते. या भागात रविवारी रात्री 8.30  वाजेच्या सुमारास मृतक जितू गागडा आणि त्याचा मित्र रॉकी पारचा हे दारू पित होते. त्यावेळी तेथून आरोपी अक्षय रेवाले जात होता. तेव्हा अक्षय आणि जितू गागडा यांच्यात रस्त्यावर दारू का पिता यावरून वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

तेव्हा दारूच्या नशेत जितू गागडा याचा मित्र रॉकी याने अक्षय रेवाले याच्या डोक्यात दारूची बाटली मारली. त्यात आरोपीचे डोके फुटले.

त्यानंतर अक्षय तिथून निघून गेला आणि त्याने इतर साथीदार बोलावले. अनिकेत घायतिडके, आतिश घायतिडके, संतोष सरदार यांना अक्षय घेऊन आला. या चौघांनी तलवार, चाकू घेऊन  जितू गागडावर भीषण हल्ला चढवला. यात जितूच्या डोक्यात, पाठीत आणि दोन्ही पायावर तलवारीने वार केले. यात जितू गागडा जागीच ठार झाला.

या प्रकरणी  अक्षय रेवाले याला पोलिसांनी रविवारी रात्रीच ताब्यात घेतले आहे. त्यानंतर उशिरापर्यंत इतर आरोपींना पोलिसांना अटक केली असून पुढील कारवाई करण्यासाठी आरोपींना विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.