Newsराजकारण

उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही; शिवसेनेचा टोला

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्येला जाण्याचा रस्ता शिवसेनेनेच तयार केला आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी निवडक १०० मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना छेडले असता त्यांनी आपल्या खास शैलीत भाजपला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यातील सर्व अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत, असं राऊत म्हणाले.

अयोध्या आणि शिवसेनेचं नातं अतूट आणि कायम आहे. हे काही राजकीय नातं नाही. राजकारणासाठी आम्ही कधी अयोध्येला जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अयोध्येला जाण्याचं निमंत्रण मिळालं आहे. चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्ताने का होईना ते अयोध्येला जातील. आम्ही अयोध्येत नेहमीच जातो, असा चिमटाही त्यांनी काढला.

दरम्यान, अयोध्येप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी थेट भाष्य करणं टाळलं. देशातील डॉक्टर, पोलीस, नर्स आणि वॉर्ड बॉय हे करोनाशी लढत आहेत. बलिदान देत आहेत. आपल्या सर्वांवर देवाचेच आशीर्वाद आहेत, असं सांगत राऊत यांनी या प्रश्नावर अधिक बोलणं टाळलं.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान कार्यालयाला ३ आणि ५ ऑगस्ट अशा दोन तारखा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैंकी पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राम मंदिराच्या भूमी पूजनात सहभागी होणार आहेत. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी मंदिर ट्रस्टच्या बैठकीनंतर दोन तारखा निवडण्यात आल्या होत्या. शनिवारी सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत चंपत राय यांच्याशिवाय अप्पर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी, कामेश्वर चौपाल, नृत्यगोपाल दास, गोविंद देव गिरी महाराज आणि दिनेंद्र दास यांच्यासहीत इतरही ट्रस्टी उपस्थित होते.