News

विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई, 10 जुलै : ‘विकास दुबेला अटक झाली त्यानंतर आम्ही याच बातमीची वाट पहात होतो…जे झालं ते पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा बदला घेतात. याच क्षणाची वाट पाहात होतो. याचं राजकारण नको करायला,’ अशा शब्दांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कुख्यात गुंड विकास दुबे याच्या एन्काउंटरवर भाष्य केलं आहे. मात्र यावेळी संजय राऊत यांनी एक आरोपही केला आहे.

‘विकास दुबे या सारखी माणसं तयार केली जातात. ती राजकारण्यांकडून निवडणुका जिंकण्यासाठी तयार केली जातात. खंडण्या गोळा करण्यासाठी… काही राज्यात हे सरू आहे. विकास दुबे हा देखील राजकारणातच होता. गुन्हेगार राजकारणात येत आहेत,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विकास दुबेचा एन्काउंटर

8 पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेला कानपूरमध्ये घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातामध्ये विकास दुबे जखमी झाला. जीपमध्ये मध्यभागी बसलेला विकासनं पोलिसांची बंदूक हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांना बचावासाठी गोळीबार करावा लागला यादरम्यान विकास दुबेचा एन्काउंटर करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या विकास दुबेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, मुंबई पोलिसात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचे एन्काउंटर होणे हे साहजिकच आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे, असं मत प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केले. ‘जेव्हा कधी एखाद्या आरोपीचे एन्काउंटर होते, तेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जातात. पण, या कुख्यात गुंडाने 8 पोलिसांची हत्या केली तेव्हा कुणीही मानवधिकार आयोगाकडे जात नाही. अशा आरोपींसोबत जे घडले ते बरोबर होते.’ असंही प्रदीप शर्मा म्हणाले.