News

सोयाबीन न उगवल्यामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

उस्मानाबाद, 05 जुलै :  उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन न उगवल्याने हताश झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

संतोष गायकवाड  (वय 38) असं या शेतकऱ्याचं नाव आहे.  कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा गावात ही घटना घडली आहे.  संतोष गायकवाड यांच्यावर बँकेचे आणि सोसायटीचे कर्ज होते. सतत नापिकी आणि त्यातच सोयाबीनची पेरणी करुनही पिकं न आल्यामुळे संतोष गायकवाड हवालदील झाले होते.

त्यांचा भाऊ अंकुश गायकवाड यांनी पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये संतोष गायकवाड यांच्यावर एसबीआय बँकेचे कर्ज होते.  कर्जाची रक्कमही लाखाच्या घरात पोहोचली होती. कर्ज कसे फेडावे अशी चिंता संतोष यांना लागली होती. तशी व्यथा त्यांनी बोलूनही दाखवली होती. त्यातच मुलांच्या भविष्याबद्दलही संतोष गायकवाड यांना चिंता लागली होती. याच नैराश्यातून संतोष गायकवाड यांनी 4 जुलै रोजी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी  शिराढोन पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

वृद्ध शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

दरम्यान,  बियाणे पेरल्यानंतरही पिकं उगवत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. पत्नीचे मंगळसुत्र विकून  सोयाबीन बियाणे खरेदी केले पण पेरणी केल्यानंतर पिकं उगवून न आल्याने एका  संतप्त वृद्ध शेतकर्‍याने बीडमध्ये बियाणे विक्री दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

बीड जिल्ह्यातील नांदुर घाट परिसरात ही 28 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती.  लालासाहेब दादाराव तांदळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील फकराबाद इथं राहणारे शेतकरी लालासाहेब दादाराव तांदळे यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे त्यांनी मणीमंगळसूत्र मोडून नांदुरघाट येथील श्रेणी ऍग्रो एजन्सी या दुकानातून ग्रीन गोल्ड – ३३४४ आणि ३३५ या वाणाच्या सोयाबीन बियाण्याच्या दोन बॅग खरेदी केले होते. शेतात पेरणी केल्यानंतर सोयाबीन काही उगवलेच नाही. त्यामुळे खर्च वाया गेला, आता दुबार पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. बियाणे का उगावले नाही, याचा जाब विचारण्यासाठी लालासाहेब दादाराव तांदळे दुकानावर आले होते. त्यावेळी तांदळे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

फक्राबाद गावचे सरपंच नितीन बिक्कड यांनी  प्रसंगावधान साधून अंगावर पाणी टाकले.  गावातील दोनशे शेतकऱ्यांच्या बाबतीत सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याचे उघड झाले आहे.