News

पालघरमध्ये धबधब्यात बुडालेल्या 5 जणांचा मृतदेह सापडला, असा झाला अपघात

मुंबई , 03 जून : गुरुवारी पालघर जिल्ह्याच्या जव्हारच्या अंबिका चौक भागात राहणारी 13 जण कालमांडवी धबधब्यात अंघोळ करण्यासाठी गेले होते. परंतु पावसाच्या पाण्यामुळे धबधब्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे 5 जण बुडाले होते. आज या पाचही जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला होता. सायंकाळी उशिरापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले. 13 जण या धबधब्याजवळ फिरायला गेले होते. तिथे 5 जणांचा बुडून मृत्यू झाला आणि सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रवक्ते सचिन नवाडकर यांनी दिली आहे.

धबधब्यात आंघोळ करायला गेलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, प्रत्येक पावसाळ्यात हा धबधबा तयार केला जातो आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक इथे सहलीला येतात. सर्व मुलं धबधब्याच्या काठावर आंघोळ करत होती. परंतु काही मुलं मस्ती करत खोलवर देली आणि हा भीषण अपघात झाला.

खरंतर कोरोनामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशात लोकांना बाहेर पडण्यावर बंदी आहे. सर्व पर्यटन स्थळंदेखील बंद आहेत. पण तरीहीदेखील काही लोक नियमांचं उल्लंघन करतात आणि त्यामुळे अशा घटनासमोर येतात. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.