बीड

शिर्डीत कोणालाही पाठवू नका; नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र

नगर – यंदा शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही. त्यामुळे कोणालाही साई दर्शनासाठी प्रवास पास देऊ नये, असे पत्रच नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना पाठवले आहे.

यंदा रविवारी (५ जुलै) रोजी गुरुपौर्णिमा उत्सव आहे. दरवर्षी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा होत असतो. त्याच अनुषंगाने शिर्डी येथे सुद्धा दरवर्षी हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डी येथे येत असतात. मात्र या वेळेला करोनाचा व्हायरस च्या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये कोणालाही शिर्डी येथे येण्यासाठी अथवा दर्शनासाठी पास देण्यात येऊ नये, अशा स्पष्ट प्रकारच्या सूचना नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना तसे पत्रच पाठवले आहे.

गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त देशभरातून साई पालख्या शिर्डीत दाखल होत असतात. मात्र साईबाबा संस्थांकडून साईमंदिर बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर साई पालखी साठी पास वितरित केल्यामुळे शिर्डी येथे वादाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नसल्यामुळे व साई मंदिर बंद ठेवण्यात आलेले असल्याने शिर्डी येथील साई दर्शनासाठी प्रवास पास देऊ नये , व संबंधित यंत्रणांना तशा आपल्या स्तरावर सूचना द्याव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.