News

लॉकडाऊनमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी वेगळे नियम, काय सुरू..काय राहणार बंद? जाणून घ्या

औरंगाबाद, 29 जून : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शहर आणि जिल्ह्यातील नियमांविषयी माहिती दिली आहे.

अनलॉक 2 मध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याला वेगवेगळे लागू राहतील, असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरातील दुकाने 9 ते 5 पर्यंत सुरू राहतील, तर रेस्टॉरंट उघडण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार आहे. मॉल आणि मोठी मार्केट यापुढेही बंद राहतील.

शैक्षणिक संस्थेत नॉन टिचिंग स्टाफ शाळेत येऊ शकेल, पण शाळा बंद राहतील. दारू दुकाने बंदच राहणार, होम डिलिव्हरी सुरू राहील. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी अजूनही पास बंधनकारक आहे. स्पा सलून ब्युटी पार्लर सुरू राहतील, त्यांच्यावर निर्बंध आहेत. वाळूज एमआयडीसी परिसरात 4 तारखेपासून 12 जुलै पर्यंत पूर्ण संचारबंदी असेल. तर औरंगाबाद एमआयडीसीत 8 दिवसांसाठी संचारबंदी असणार आहे. तसंच कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आला नाही तर शहरातही संचारबंदी लागू शकते, अशी माहिती या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.

या 11 जिल्ह्यांमध्ये होणार सर्वात कडक अंमलबजावणी

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरू झाला. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जिथं आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता अशा ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक,धुळे,जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.