News

जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांवर प्राणघातक हल्ला

अंबाजोगाईतील घटना; सहा जणांवर गुन्हा

अंबाजोगाई : दुचाकीवरून घराकडे निघालेल्या दोघांना अडवत सहा जणांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना मंगळवारी रात्री अंबाजोगाई-केज रोडवर चनई शिवारात घडली. याप्रकरणी सहा जणांवर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील सुधीर छगनराव चौधरी आणि त्यांचा मित्र नितीन ठोंबरे हे दोघे मंगळवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून गावातील घराकडे निघाले होते. ते अंबाजोगाई – केज रोडवर चनई शिवारातील शंभूराजे ढाब्यासमोर आले असता त्यांना शुभम भारत चौधरी, बालाजी हरिश्चंद्र चौधरी, अनुपम भारत चौधरी, बाळा गायके, श्रेयस काळदाते, संकेत शिंगटे (सर्व रा. अंबाजोगाई) या सहा जणांनी त्यांची दुचाकी अडविली. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी सुधीर चौधरी आणि नितीन ठोंबरे यांना शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण करून दोघांनाही गंभीर जखमी केले व चारचाकी वाहनात (एमएच ४४ – ८१८९) मध्ये बसून निघून गेले. थोड्यावेळाने सावरलेल्या सुधीरने वडिलांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी दोघाही जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले असे सुधीर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारीवरून सहा हल्लेखोरांवर अंबाजोगाई शहर पोलिसात कलम ३०७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ३४१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सिद्धार्थ गाडे करत आहेत.