बीड

खोके घेऊन ओके झालात, पण आमच्या रोजगाराचे काय?- आदित्य ठाकरेंचा सवाल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- तुम्ही खोके घेऊन तुम्ही एकदम ओके झालात, पण आमच्या रोजगाराचे काय, असा प्रश्न तरुणांचा आहे. फक्त शिवसेनेच्या नाही, तर महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप शनिवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. खोके सरकारचे लक्ष त्यांच्या गटात कोण येतेय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतेय, याकडे कुणाचेच लक्ष नाहीय, या शब्दांत त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.

शिंदे गटावर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. जो प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणे गरजेचे होते. जो येऊ शकत होता. तो प्रोजक्ट दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. वेदान्त-फॉक्सकॉन, बल ट्रक पार्क आणि मेडिसिन डिव्हाइस पास्क हा प्रकल्पही आता महाराष्ट्रातून निघून गेला आहे. महाराष्ट्रातून एक-एक प्रकल्प बाहेर जात आहेत. 100 टक्के तळेगावात येणारा प्रोजक्ट सरकार बदलल्यानंतर पळवालाच कसा? मविआ सरकार असते तर असे घडले नसते.

आदित्य ठाकरे म्हणाले, एकंदरीत आतापर्यंत महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेले. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी राजकारण केले. ते आम्हाला राजकारण करू नये, असे शिकवत आहेत. आम्ही राजकारण करत नाही आहोत. मुळात तरुणांच्या नोकरींबद्दल बोलणे राजकारण आहे. तर ठीक आहे आम्ही राजकारण करत आहोत. चांगल्या गोष्टींसाठी आम्ही बोलत आहोत.

राज्यात तब्बल साडेतीन लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक आणू शकणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प शेवटच्या क्षणी गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकार हे सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. राज्यभरामध्ये आंदोलन केली जात आहे.