महाराष्ट्र

सेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं; “अजून परवानगी मिळाली नाही…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Aug :- शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी चर्चेचा आणि राजकीय वर्तुळासाठी उत्सुकतेचा विषय असतो. या मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख नेमकी काय भूमिका मांडणार आणि कुणावर हल्लाबोल करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. यंदा मात्र दसरा मेळावा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

यावेळी नेमका दसरा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा होणार की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा होणार? यावरून बरीच चर्चा सुरू आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमानुसार जे योग्य असेल, ते केलं जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावरून शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. मात्र, या मेळाव्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून त्यासंदर्भात नियमात जे असेल, त्यानुसार कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे. मात्र, आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार की शिवसेनेला परवानगी मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

यासंदर्भात नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर आगपाखड केली आहे. दसरा मेळावा शिवसेनेचाच असतो आणि शिवसेनेचाच राहणार, असं ठामपणे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. “आम्ही परवानगीसाठी सतत प्रयत्न करत आहोत. पण गद्दार सरकार दडपशाहीचं धोरण अवलंबत आहे.

या सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. पण शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होतो ही प्रथा आहे. जनता देखील बघत आहे. अनेक वर्ष महाराष्ट्राची राजकीय परंपरा मोडून ही गद्दारी झाली आहे. हीच गद्दारीची प्रथा हे गद्दार खोके सरकार पुढे नेत आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

“हा शिवसेनेचा विषय आहे. शिवसेना शिवतीर्थावर नेहमीच दसरा मेळावा करत आली आहे. खोके सरकार किती दिवस टिकेल, हे काही दिवसांतच आपल्याला कळेल. आम्ही परवानगीसाठीचा अर्ज द्यायला जात आहोत. पण तिथे कुणी त्याचा स्वीकार करत नाहीये. हे सरकार दडपशाहीचं सरकार बनू लागलंय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.