महाराष्ट्र

राठोड, सत्तारांना लॉटरी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Aug :- राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात पार पडला. त्यात 50-50 फॉर्म्युल्यानुसार भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 अशा एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी सत्ताधारी पक्षांसह विरोधी बाकावरील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

दुसरीकडे, मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी नाकारण्यात आल्यामुळे शिंदे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. विशेषतः पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्रिपद गमावलेले आमदार संजय राठोड व टीईटी घोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळेही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करणाऱ्या विरोधकांनी स्वतःला आरशात पाहण्याचा सल्ला देत त्यांची टीका फेटाळून लावली आहे.

भाजपचे मंत्री 1. सुरेश खाडे 2. चंद्रकांत पाटील 3. राधाकृष्ण विखे-पाटील 4. गिरीश महाजन 5. अतुल सावे 6. रवींद्र चव्हाण 7. विजयकुमार गावित 8. सुधीर मुनगंटीवार 9. मंगलप्रभात लोढा
शिंदे गटाचे मंत्री 1. दादा भुसे 2. संदीपान भुमरे 3. उदय सामंत 4. शंभूराज देसाई 5. गुलाबराव पाटील 6. अब्दुल सत्तार 7. संजय राठोड 8. दीपक केसरकर 9. तानाजी सावंत

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू आहे. या बैठकीत कोणाला मंत्रिपद द्यायचे हे नाव निश्चित होणार आहे. सोबतच अब्दुल सत्तार यांना मंत्री करायचे की नाही यावरही या बैठकीत सल्लामसलत होईल. 30 जून रोजी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर दोघांनीच मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन पेट्रोलवरील कर कमी करणे, शेतकऱ्यांना अनुदान यांसारखे निर्णय घेतले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नव्हता. त्यामुळे सत्ताधारी आमदारांत धाकधूक वाढली होती, तर विरोधी पक्षांचे नेतेही शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करत होते. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्लीत 6 वाऱ्या झाल्या होत्या.