महाराष्ट्र

भविष्यात कुणी शिवसेनेच्या नादी लागण्याचा स्वप्नातही विचार करता कामा नये- ठाकरे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Aug :- तुम्ही सगळे येथे जमलात. मी कुणालाही कमी लेखत नाही. आपल्याला मर्दासारखंच जिंकले पाहिजे. आपली सदस्यसंख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे, की भविष्यात कुणी शिवसेनेच्या नादी लागण्याचा स्वप्नातही विचार करता कामा नये, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मातोश्रीबाहेर नाशिकमधील शिवसेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेबाबत उद्धव ठाकरे बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, नाशिकमध्ये किमान सदस्यसंख्या एक लाखाच्या वर गेली पाहिजे. कारण, माझा भरवसा तुमच्यावर आहे. माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरे कुणी नाही. त्यांच्या यंत्रणा कामाला लावला आहे. तुमची साथ मला अशी तशी नकोय. ही गर्दी छान आहे. गर्दीचा फोटो चांगला आहे. पण, तो घेऊन मी निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाही. ते मला सदस्यसंख्या, प्रतिज्ञापत्र विचारतील. त्यामुळे मला प्रतिज्ञापत्र पाहिजेत.

शिवसैनिकांना आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला सगळ्यांना वेळ आल्यावर चांगली जबाबदारी देणार. पण आत्ता शिवसेनेचा भगवा हातात घट्ट पकडा. शिवसैनिकाचे रक्त असणारे आपले मनगट आहे. तुमच्या हातातून भगवा खेचणे दूरच, पण भगव्याला हात लावण्याचा जरी कुणी प्रयत्न केला, तरी त्याला दाखवून द्या.

कायदेशीर आणि राजकीय लढाईसोबतच आता केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे- शिंदे गटांचा सामना रंगला आहे. सुप्रीम कोर्टात लढाई सुरू असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगातही दोन्ही गटाची लढाई सुरू झाली आहे. मूळ शिवसेना कोणती आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाकडे राहणार? यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय झाल्याशिवाय कोणताही ठोस निर्णय घेतला जाऊ नये, असे निर्देश शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.