भारत

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात हाणामारी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 May :- सोमवारी पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. महागाईच्या मुद्द्यावरुन भर कार्यक्रमातच स्मृती इराणी यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली व नंतर सभागृहाबाहेर हाकलून दिले. आज याप्रकरणी भाजपच्या 3 कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन पोलिस ठाण्यात भस्मराज तीकोने, प्रमोद कोंढरे व मयूर गांधी या भाजपच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण व त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

काल स्मृती इराणी पुण्यात पोहोचताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इराणी ज्या हॉटेलमध्ये थांबल्या त्याबाहेरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. हॉटेलबाहेर इंधनदरवाढीचे पोस्ट घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींविरोधात घोषणा दिल्या. या गोंधळामुळे स्मृती इराणी यांना काही काळ हॉटेलबाहेरही निघता आले नव्हते. यावेळी आंदोलकांनी हॉटेलमध्येही शिरण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर स्मृती इराणी बाहेर आल्या.

दुसरा गोंधळ बालगंधर्व सभागृहात झाला. येथे केंद्रीय मंत्र्यांचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. याला विरोध करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची भाजप कार्यकर्त्यांशी हाणामारी झाली. हाणामारीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. स्मृती इराणी यांचा सत्कार समारंभ चालू असतानाच ही घटना झाली.

स्मृती इराणी यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेला गोंधळ हे भ्याड कृत्य आहे. राज्यात आपल्या पक्षाचे गृहमंत्री असल्यानेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असा गोंधळ घालू शकले. या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई न केल्यास जशास तसे प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

बालगंधव सभागृहात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, नालायक, नीच लोकांनी महिलेवर हात उचलला व मारहाण केली. ज्यांनी आमच्या भगिनींवर हात उचला त्याचा हात गळ्यात बांधणारच, आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. करार जवाब देंगे, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला.