महाराष्ट्र

‘या’ तारखेला लागणार 10 वी, 12 वीचा निकाल लागणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 May :- महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च ते एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या ​​​​​​दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत तर बारावीचा निकाल 10 जूनला लागणार असल्याची माहिती एसएससी बोर्डाकडून आज देण्यात आली आहे. त्यामुळे निकाल कधी लागणार या प्रश्नाचे उत्तर बोर्डानेच विद्यार्थ्यांना दिले असून आता निकाल काय लागणार याचीच विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्याचे काम जलदगतीने सुरु असल्याचेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या एकुण 30 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यांच्या निकालाची तारीख आता जाहीर झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करावा लागला होता.

यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून तर 15 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली होती. विद्यार्थी करोना बाधित झाल्याने किंवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकल्याने 5 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू झाली होती. 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून राज्यात 21 हजार 384 ठिकाणी परीक्षा झाली आहे. आता या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.

राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात 6 लाख 22 हजार 994 विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे तर 4 लाख 37 हजार 336 कला शाखेचे होते. वाणिज्य शाखेतील 3 लाख 64 हजार 262 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 5 हजार 202 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर टेक्निकल सायन्सच्या 932 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.