महाराष्ट्र

मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद विकोपाला

9 May :- ओबीसी आरक्षणप्रश्नी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. शिवसेनेची केवळ प्रभाग रचनेत रुची असल्याने ओबीसी आरक्षणाचा लढा एकट्या राष्ट्रवादीला लढावा लागतो आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाकडे आहेत.

परिणामी कुठली मात्रा चालत नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी वाढली आहे. ओबीसी (इतर मागासवर्ग) राजकीय आरक्षणाचा लढा शिवसेनेकडे असलेला नगरविकास विभाग आणि राष्ट्रवादीकडे असलेला ग्रामविकास विभाग या दोहोंचा आहे. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हाती असलेला नगरविकास विभाग मुंबई व ठाणे महापालिकेत आपल्या सोयीची प्रभाग रचना करवून घेण्यात व्यग्र आहे. त्यामुळे आयोगाची नाराजी ओढवून घेण्याचे शिवसेना टाळत आहे.

६ मे रोजी झालेल्या निवडक मंत्र्यांच्या बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील मतभेद विकोपाला गेले. राज्य निवडणूक आयोग सहकार्य करत नाही, या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आक्षेपाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फारसे लक्ष दिले नाही.

राष्ट्रवादीचे ग्रामीण भागात वर्चस्व असून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये या पक्षाला रुची आहे. त्याउलट शिवसेनेला मुंबई व ठाणे महापालिकेत अधिक रस आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाशी पंगा न घेण्याचे धोरण शिवसेनेने ठेवले आहे. परिणामी ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचा भार राष्ट्रवादीच्या खांद्यावर पडला आहे.