भारत

अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही; BJP खासदाराचा इशारा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 May :- उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू न देण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले -राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा अवमान केला आहे. अयोध्येत येण्यापूर्वी त्यांनी हात जोडून त्यांची माफी मागावी. अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही.

एवढेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांची भेट न घेण्याचा सल्ला दिला आहे. ठाकरे कुटूंबाचा राम मंदिर आंदोलनाशी कोणताही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्येत प्रभु रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी एका ट्विटद्वारे त्यांच्या या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले -उत्तर भारतीयांचा अवमान करणाऱ्या राज ठाकरेंना आम्ही अयोध्येच्या सीमेत घुसू देणार नाही. अयोध्येत येण्यापूर्वी त्यांनी प्रथम उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी.

त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही ठाकरेंची भेट न घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले -राज ठाकरे जोपर्यंत जाहीरपणे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊ नये. राम मंदिर आंदोलनात केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व सर्वसामान्यांची भूमिका आहे. ठाकरे कुटूंबाचे याच्याशी कोणतेही देणेघेणे नाही.

भाजप खासदार बृजभूषण सिंह पुढे म्हणाले की, आम्ही 2008 पासून पाहत आहोत, त्यांनी ‘मराठी माणूस’ हा मुद्दा समोर आणला, मुंबईच्या विकासात 80% योगदान हे त्या शहरातील नसलेल्या लोकांचे आहे. त्यांनी आपली चूक सुधारावी. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा मी त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे की, त्यांनी माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटूही नका.

राज ठाकरेंनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रशंसाही केली आहे. त्यामुळे मनसे व भाजपत जवळकीत वाढत असल्याची शक्यता दिसून येत असतानाच आता बृजभूषण यांनी राज ठाकरेंना विरोध केल्यामुळे या संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे उत्तर भारतीयांच्या मुद्यावर मनसे व राज ठाकरेंची भूमिका जाहीर आहे. त्यामुळे भाजपने नेहमीच आतापर्यंत त्यांच्यापासून अंतर राखले. महाराष्ट्रात मनसेशी हातमिळवणी केली तर त्याचा फटका उत्तर भारतात बसेल, अशी भीती भाजपला या प्रकरणी वाटते.