महाराष्ट्र

राज ठाकरेंवरील कारवाईवर दरेकरांची प्रतिक्रिया

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 May :- राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजीच्या सभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर मनसेच्या आणि भाजपच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही कारवाई सुडबुद्धीने सुरू आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, आंदोलन होणारच असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंना प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून सरकार घाबरले, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर कुणावरही होऊ शकतो. राज्य सरकारने सुड भावनेतून ही कारवाई केली आहे. राज्य सरकारकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करत त्यांना शांत करण्याचा केवीलपणा प्रयत्न सध्या सुरू आहे. ठाकरे सरकारला शांतता नकोय, हिटलर शाही मार्गाने ते शांतता ठेवू पाहताय, मात्र असे होऊ शकणार नाही. असे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, सभेला परवानगी न देणे, जाचक अटी टाकणे, या आधी एखाद्या सभेला अशा अटी होत्या का? आम्हाला वाटते की, राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव आहे. आम्हाला खात्री आहे की, त्यांची कलमं कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. आम्हाला घाबरवण्यासाठी असे गुन्हे दाखल केले जात आहेत, पण महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, आंदोलन होणारच.

हिंदुत्वावर बोलण्याने जर गुन्हे दाखल करण्यात येणार असेल, तर आम्ही असे अनेक गुन्हे दाखल होऊ देऊ असे म्हणत मनसेचे शहराध्यक्ष गजन गौडा यांनी म्हटले आहे. हिंदुत्ववासाठी असे अनेक गुन्हे याआधीही राज ठाकरेंवर आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर झाले आहेत. आणि यापुढेही असे अनेक गुन्हे हिंदुत्वासाठी घ्यायला आम्ही तयार आहोत. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.