महाराष्ट्र

शरद पवारांच्या बंगल्यावर दगडफेक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 April :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या जमावाने अचानक हल्लाबोल केला. शरद पवार हाय -हाय अशा घोषणा देत हा जमाव बंगल्याच्या दिशेने चालून आला.जमावातील काही जणांनी सिल्व्हर ओकच्या दिशेने चपला, दगडही भिरकावले. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी घराकडे धाव घेत आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची तयारी दर्शवली. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली.

काही वेळानेच तेथे पोलिसांची कुमक दाखल झाली आणि त्यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची धरपकड केली. जवळपास पाच महिने झाले तरीही शासनाने आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या अद्याप पूर्ण केल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या चोरांचे चाणक्य शरद पवार आमच्याकडे बघायला तयार नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार आहेत, अजित पवारही जबाबदार आहेत. 120 एसटी कर्मचारी शहीद झाले आहेत, अशा भावना आंदोलकांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केल्या. त्यानंतर या जमावाने थेट शरद पवारांच्या बंगल्यावर हल्लाबोल केला.

जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांतच होते, जेव्हा गांधिगिरी सोडली तेव्हा मात्र आम्ही शरद पवारांना पळता भुई थोडी होईल. निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न करत या आंदोलकांनी पवारांविरोधात संतप्त व्यक्त केला.एसटी कर्मचारी संतप्त झाले अचानक पवारांच्या बंगल्यात घुसून त्यांनी पवारांच्या घरावर चपलांचा वर्षाव केला, दगडफेकही केली. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर पोलिस लगेचच घटनास्थळी पोहचले असून ते आंदोलकांना समजावत आहेत. या सर्व गदारोळादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या आंदोलकांना सामोरे गेल्या.

आंदोलकांना त्या म्हणाल्या, माझे आई-वडील घरात आहेत. त्यांची स्थिती काय आहे हे मला बघू द्या. मी दोनच मिनिटांत त्यांना बघून तुमच्याशी चर्चा करते, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केली. सुळे यांनी आंदोलकांना हात जोडून विनंती केली, त्यानंतर त्या बंगल्यात गेल्या. माझ्या घरावर हल्ला झाला हे दुर्दैवी आहे, अशी घटना मी महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहिली. मी मुंबई पोलिसांचे आभार मानते, कारण माझे वडील आई आणि छोटी मुलं घरात होती. आता आंदोलकांना हात जोडून विनंती की, शांततेच्या मार्गाने आपण चर्चेला बसू शकतो.

यापूर्वीही आम्ही शांततेच्या मार्गानेच प्रश्न सोडवले आहेत. कोरोनात गरज आहे असे सांगता अन् नंतर आम्ही मेलो तरी चालते, त्यापेक्षा आम्हाला सर्वांनाच संपवा, गेले पाच महिने वेळ नव्हता आता सुप्रिया सुळे कशा आल्या, असा सवालही आंदोलकांनी केला आहे. आमचे कष्ट बघा, घाम बघा आम्हाला काहीही मोबदला दिला नाही. सत्य परिस्थिती तुम्ही जाणून घ्या.

आमचे सहकारी आम्ही गमावले या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार व महाविकास आघाडी जबाबदार आहे, त्यांनी अद्यापही न्याय दिला नाही, अशा संतप्त भावना आंदोलकांनी केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा हा गोंधळ सुरू असतानाच दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आले. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी म्हटले की, आमच्या नेत्यांनी फक्त विलिनीकरणाचा मुद्दा सोडून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सदावर्ते आणि त्यांच्या बगलबच्चांनी ठरवून हा हल्ला केला. आम्ही सडेतोड उत्तर देऊ. फक्त आमच्या नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, अशा संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.