महाराष्ट्र

बारावीचा गणिताचा पेपर फुटला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 March :- राज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहेत. शनिवारी झालेला बारावीचा रसायन शास्त्राचा पेपर मुंबईतील परीक्षा केंद्रावर फुटल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात मालडच्या खासगी क्लासेसच्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. यापाठोपाठ अहमदनगरच्या श्रीगोंद्यातही आज गणिताचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले आहे. आज बारावीची गणित व संख्याशास्त्र विषयाची परीक्षा होती. यात गणिताचा पेपर फुटला असून श्रीगोंद्यातील परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी पोहचले असून या प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी परीक्षा झाली नाही. यावर्षी ती ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाची पेपर होता. मात्र तत्पूर्वीच सुमारे पावणे दहा वाजेच्या सुमारास श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित मिळाली होती. श्रीगोंद्यात नियमानुसार दरवर्षी सहा परीक्षा केंद्र असतात परंतु आता कोरोना पार्श्‍वभूमीवर यांची संख्या वाढून १७ ठिकाणी हे परीक्षा केंद्र आहेत.

या परीक्षेसाठी तालुक्‍यात सुमारे तीन हजार विद्यार्थी बसले असून मोबाईलवर सोशल मीडियातुन प्रश्नपत्रिका उत्तरासहित वितरित झाल्याने गोंधळ उडाला आहे. दरम्यान याबाबत शिक्षण विभाग तसेच परीक्षेला असणाऱ्या शिक्षकांना कुठलीच माहिती नसल्याचे समजते. मात्र सदर प्रतिनिधीने यांच्याकडे याबाबत प्रश्न पत्रिका पाठवून विचारणा केली असता फुटलेली प्रश्नपत्रिकाही परीक्षेतील असल्याचे सांगण्यात आले.

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील वाळके यांना या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी खात्री करून मोबाईलवरील व परीक्षेतील प्रश्नपत्रिका एकच असल्याचे सांगितले. मात्र हा प्रकार श्रीगोंद्यातील झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला. मुंबईतील परीक्षा केंद्रावर व्हॉट्सॲप चॅटवरून पेपर बाहेर आल्याचे प्रकरण घडले आहे. या पेपरफुटीप्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसचा प्राध्यापक मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे.

विले पार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना हा पेपर आधीच मिळाला होता. आता पेपर व्हायरल करणा-या तीन विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने पुन्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याची चौकशी सुरू आहे. टीईटी, लष्कर भरतीपासून परिक्षांमध्ये घोटाळे झाल्यानंतर आता पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, याचीही माहिती घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.