महाराष्ट्र

राज्यात नवी नियमावली जारी; वाचा, कधी कुठे काय सुरु राहणार?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 March :- कोरोना संसर्गाचा प्रभाव ओसरल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा यात समावेश असून या जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने हॉटेल्स, सिनेमा आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पर्यटन आणि धार्मिकस्थळेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाट्य, सिनेमासह पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे. इतर जिल्ह्यात हॉटेल, सिनेमा आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, निर्बंध शिथील करण्यात आले तरी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

मुंबईसह राज्यातील 14 जिल्ह्यातील कोरोनाची संख्या घटली आहे. त्यामुळे त्यांची निर्बंधनातून सुटका करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार या 14 जिल्ह्यात सिनेमा आणि नाट्यगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं आणि हॉटेल्सही 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

स्पा आणि स्पोर्टसही या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. इतर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती जैसे थे असल्याने त्या ठिकाणी कोरोना नियमात शिथिलता देण्यात आली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू असलेले नियमच बंधनकारक राहणार आहेत.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांना निर्बंधातून सूट मिळणार
सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पर्यटन स्थळं, हॉटेल्स, बार, स्पा, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन मैदाने आदी 100 टक्के क्षमतेने सुरू होणार.


सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतात. सर्व उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतात, असं या नियमावलीत म्हटलं आहे.
राज्य सरकारने या 14 जिल्ह्यांना ए श्रेणीत टाकलं आहे. या ए श्रेणीतील जिल्ह्यातील 90 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर 70 टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. तसेच या जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्के आहे. तसेच ऑक्सिजन सपोर्टेड बेडची किंवा आयसीयूतील बेडची क्षमता 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच निर्बंधात सूट देण्यात येत असल्याचं नियमावलीत म्हटलं आहे.