News

महाराष्ट्रावर आणखी एक संकट

अम्फान चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आदळ्ल्यानंतर दहा दिवसानंतर महाराष्ट्र आणि गुजरातसाठी हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुढील 48 तासात अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दोन्ही किनारपट्टीतील राज्यांना 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचे संकेत आहेत. यामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे.
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, रविवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. तर सोमवारी सकाळी मुंबईत पावसाचं आगमन झाल्यानं मुंबईकर सुखावला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते.हवामान खात्यानं त्यांच्या दैनंदिन बुलेटिनमध्ये अरबी समुद्रात दोन वादळ तयार होत असल्याचं सांगितलं आहे. यातील एक आफ्रिकन किनाऱ्यापासून ओमान यमनच्या दिशेने जाईल तर दुसरं वादळ भारताजवळ सज्ज आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्राच्या आग्नेय-पूर्व-मध्य-प्रदेशात येत्या 48 तासांत कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. पुढील 48 तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. वायव्य दिशेकडे वाटचाल करीत हे वादळ जूनपर्यंत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळेल.